मंत्री कॉलनी येथील श्री बिरदेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री बिरदेव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सकाळी सहा वाजता पाळणा गायन करून पुष्प अर्पण करण्यात आले तसेच जन्मकाळ साजरा करण्यात आला. यावेळी धनगर समाजातील तसेच परिसरातील तमाम माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यानंतर सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाच्या तयारीला सुरुवात झाली. सायंकाळी सात वाजता श्रींची महाआरती संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ करण्यात आला. ईश्वरपूर शहर व परिसरातील हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सर्व समाज बांधवांनी अत्यंत उत्कृष्ट नियोजन करत कोणताही गडबड-गोंधळ न होता रात्री अकरा वाजेपर्यंत शांततेत महाप्रसाद कार्यक्रम पार पाडला. उपस्थित भाविकांनी संयोजनाचे कौतुक केले.
यावेळी बोलताना ईश्वरपूर धनगर समाजाचे प्रमुख श्री राहुल टिबे म्हणाले, “आमच्या चौथ्या पिढीपासून मंत्री कॉलनी येथे श्री बिरदेव मंदिर आहे. येथे वर्षभर दसरा, गुढीपाडवा यांसारखे विविध सण आणि धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दरवर्षी सकाळी जन्मकाळ साजरा केला जातो आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे सायंकाळी सातनंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते. महाप्रसादासाठी देणगी देणाऱ्या सर्व समाज बांधवांचे धनगर समाजाच्या वतीने मनःपूर्वक आभार.”
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईश्वरपूर धनगर समाजातील सर्व बांधव व मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.