अकोले तालुका प्रतिनिधी.राजूर येथे झालेल्या जनता दरबारात पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या अन्यायाचा प्रश्न ऐरणीवर आला. राजूर शहरात स्वच्छता राखणे व नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडणारे संजय पवार व विजय पवार या दोन कामगारांना कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता अचानक कामावरून कमी करण्यात आल्याची तक्रार आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासमोर मांडण्यात आली.
या दोन्ही कामगारांनी अनेक वर्षे राजूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी परिश्रम घेतले. विशेषतः विजय पवार हे दररोज ९० हून अधिक वॉल्व्ह फिरवून दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी कार्यरत होते. मात्र त्यांना कामावरून दूर केल्यानंतर अनेक भागांत पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून काही ठिकाणी आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले की, राजूरकरांना नियमित व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी त्यांनी आपल्या निधीतून सुमारे १५ लाख रुपये खर्च करून स्टॅबिलायझर उपलब्ध करून दिले होते, जेणेकरून मोटारी वारंवार जळण्याचे प्रकार थांबतील. मात्र काही व्यक्तींकडून दादागिरीच्या माध्यमातून कामगारांना हटवून पाणीपुरवठा व्यवस्थेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
राजूरमधील अनेक महिलांनीही विजय पवार यांनाच पुन्हा पाणीपुरवठ्याच्या कामावर ठेवण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ग्रामपंचायतीच्या कारभारावर करण्यात आलेल्या आरोपांबाबतही पुरावे सादर करण्यात आले असून, केवळ बदनामी व दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.
"राजूरमध्ये अराजकता निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि नागरिकांना नियमित पाणीपुरवठा मिळण्यासाठी आपण ठामपणे उभे आहोत," असे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी स्पष्ट केले.