दैनिक आखुर | सोलापूर : जिल्ह्यात खळबळ उडवणारी धक्कादायक घटना समोर आली असून, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात तिहेरी हत्याकांड घडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सख्ख्या दिराने भावजयीसह तिच्या दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरामणी येथील मस्के कुटुंबीयांची घरे एकमेकांच्या शेजारी असून, मधल्या घरात गायत्री सुधाकर मस्के (वय ४२), त्यांची मुलगी प्रिया (वय १८) आणि मुलगा शिवराय (वय १६) राहत होते. मंगळवार मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी दिराने घराच्या गच्चीवरून प्रवेश करून झोपेत असलेल्या तिघांवर धारदार शस्त्राने सपासप वार केले.
या हल्ल्यात गायत्री आणि प्रिया यांचा मृतदेह गच्चीवरच आढळून आला, तर शिवरायचा मृतदेह घराच्या बैठकीच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला. ठसे तज्ञ, गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला असून पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
गायत्री मस्के या विधवा असून त्या आपल्या दोन मुलांसह राहत होत्या. शेजारीच सख्ख्या दिराचे घर असल्याने शेतजमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेमुळे बोरामणी गावासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.