गुंजेगाव (प्रतिनिधी) – मौजे सज्जा गुंजेगाव व राणीसावरगाव मंडळातील शेतकऱ्यांना सन २०२५-२६ चा खरीप पीक विमा लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी पंचायत समिती सदस्या श्रीमती शांताबाई देवराव माने यांनी केलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला विविध लोकप्रतिनिधींनी भेट देत पाठिंबा दर्शविला.
उपोषणस्थळी भेट देऊन संबंधित समस्या जाणून घेतल्यानंतर प्रशासनाशी तत्काळ संपर्क साधण्यात आला. यावेळी मा. तहसीलदार मॅडम यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली. तसेच श्रीमती माने व शासन यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका बजावत शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
या संदर्भात मा. तहसीलदार मॅडम यांनी नायब तहसीलदार व संबंधित केंद्र अधिकाऱ्यांना उपोषणस्थळी पाठवून सर्व माहिती जाणून घेतली. तसेच पीक विम्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, "शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही कायम त्यांच्या पाठीशी आहोत. भविष्यात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आमची संपूर्ण टीम शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभी राहील," असे आश्वासन देण्यात आले.
उपोषणस्थळी पंचायत समिती उपसभापती खांडेकर सर, पंचायत समिती सदस्य श्रीकांत गायकवाड, पंचायत समिती सदस्य धम्मा पवार यांच्यासह गुंजेगाव व राणीसावरगाव मंडळातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खरीप पीक विम्याच्या प्रश्नावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच या मागण्यांवर निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.